
मराठीतील उत्तमोत्तम साहित्यकृती - कविता
कविता - वामांगी
कवि - अरुण कोल्हटकर
देवळात गेलो होतो मधे
तिथे विठ्ठल काही दिसेना
रख्माय शेजारी
नुसती वीट
मी म्हणालो असू दे
रख्माय तर रख्माय
कुणाच्या तरी पायावर
डोकं ठेवायचं
पायावर ठेवलेलं
डोकं काढून घेतलं
आपल्यालाच पुढेमागे
लागेल म्हणून
आणि जाता-जाता सहज
रख्मायला म्हणालो
विठू कुठे गेला
दिसत नाही
रख्माय म्हणाली
कुठे गेला म्हणजे
उभा नाही का माझ्या
उजव्या अंगाला
मी परत पाहिलं
खात्री करून घ्यायला
आणि म्हणालो,
तिथे कुणीही नाही
म्हणते, नाकासमोर
बघण्यात जन्म गेला
बाजूचं मला जरा
कमीच दिसतं
दगडासारखी झाली
मान अगदी धरली बघ
इकडची तिकडं
जरा होत नाही
कधी येतो, कधी जातो
कुठं जातो, काय करतो
मला काही काही
माहिती नाही
खांद्याला खांदा भिडवून
नेहमी बाजूला असेल विठू
म्हणून मी पण बावळट
उभी राहिले
आषाढी-कार्तिकीला
इतके लोक येतात नेहमी
मला कधीच कसं कुणी
सांगितलं नाही
आज एकदमच मला
भेटायला धावून आलं
अठ्ठावीस युगाचं
एकटेपण...